Sunday, April 24, 2011

राग तुझा

राग तुझा

राग नको धरू सखे मज् वरी
होते काळजाची लाही लाही,
द्वेष माझा का ग तुला
तुजवाचून  शब्दान्स या अर्थ नाही.

वागतो कधी खूळा
वाटतो तुला कधी मूर्खही,
कल्पना आहे मला
सवय माझी विचित्र ही.

मनापासून विचारशील
तर कारण वेडाचे सांगीनही,
तुझ्या प्रेमानेच केलय मला
खूळा आणि स्वार्थीही.

मोहक चेहरा.. सुबक बांधणी
तुझे दिवाणे अनेक असतीलही,
रुद्र डोळ्यांनीच तुझ्या
लावलय  वेड मला ह्या आधीही.

                                    - देसाई अभिजीत.




Tuesday, April 19, 2011

चांद रात


चांद रात
चंद्र तुझ्या डोळ्यात पाहिला मी
तारकांची रोषणाई होती,
रात्र तुझ्या केसात माळली मी
तांबड्याची आस नव्हती.

स्पर्श माझा नवखा न तुला
डोळे तरीही तू मीटली होती,
तू मला अन् मी तुला
भेटण्याची रात्र होती...

तांबड्याची आस नव्हती.

                                        - देसाई अभिजीत




Sunday, March 6, 2011

वजनावळ

    "वजनावळ" ... एक्च्युयली वजनावळ हा शब्द आधी तुम्ही कुठे ऐकला आहे की नाही हे मला ठाऊक नाही, ऐकला असेलही कदाचित पण मला हा शब्द सुचला घडणावळ ह्या शब्दातून. खरे तर घडणावळ हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो.. एक म्हणजे मानवी आयुष्यात एखाद्या व्यक्तीची, व्यक्ती म्हणून वाढ होत असताना त्याला मिळालेली किंवा त्याला दिली गेलेली शिकवण, मग ती चांगली असो वा वाईट  आणि दुसरा अर्थ म्हणजे आपण सराफाच्या म्हणजेच सोनाराच्या दुकानात गेलो असताना त्याने दागिना बनविण्यासाठी आपल्याकडून घेतलेली किंमत... अर्थातच मेकिंग चार्ज.

तर ह्या दुसर्‍या अर्थाशी समरूप असा हा शब्द.. वजनावळ. सविस्तरपणे सांगायचे म्हणजे आपण आपले वजन ( इनडाइरेक्ट्ली संपूर्ण शारीरिक काळजी ) सांभाळण्यासाठी खर्च केलेला पैसा. मग तो मोठाले ब्रँड नेम असलेल्या जिम जॉइन करण्यासाठी केलेला असो वा अगदी डाइयबिटीस होऊ नये किंवा वाढु नये यासाठी विकत आणलेल्या गोळयांसाठी असो. आपणच आपल्या शरीराच्या चांगल्या घडणीसाठी बाजार रूपी सराफ्याला देऊ केलेली किंमत.

आदल्या रात्री कामामुळे उशिरा झोपुनहि सकाळी ७.२० ची फास्ट लोकल पकडण्यासाठी केलेली धावपळ, ह्या धावपळीत स्कीप केलेला सकाळचा घरगुती नाश्ता, मग ऑफीस मधे टेबलवरुनच, खालच्या, आपल्या अन्नाकडून मागवलेला वडा पाव, मीटिंगमुळे संध्याकाळी ५ वाजता केलेला दुपारचा लंच, रात्री कोणत्यातरी क्लाइंट बरोबर असताना फॉरमॅलिटी करता घ्यावी लागते म्हणून किंवा बॉसच्या कोणत्यातरी साडूच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्यायलेली बियर, आणि उशिरा घरी आल्यावर मध्यरात्री का होईना मिळालेली झोप.........झोपेचा क्रॅश कौर्सच तो. स्वप्नात सुद्धा उद्याच्या शेअर मार्केटच टेन्शन. किती अनुकूल परिस्थिती आहे ही आजकालची.....  वजनावळ देण्यासाठी.
बर... हे झाले वीकडेस मधे, वीकेंड्स ची तर औरच मजा.... गल्लोगल्ली झालेले फास्टफुड कॉर्नर्स, अटेंड केलेली पार्टी, सिनेमागृहात सिनेमा पाहताना फस्त झालेले पॉप्कऑर्न्सचे टब आणि कोल्ड्ड्रिंक्स.

मग कधीतरी अचानक बायको, गर्लफ्रेंड किंवा मित्राचे  शब्द कानावर पडतात.... "सूटलास की रे साल्या...." "डोक्यावर विमानतळ होतंय बघ". त्यावेळी मात्र आपण पोटावर/डोक्यावर  हात फिरवतो आणि म्हणतो "प्रोस्पॅरिटीची साइन आहे बॉस, मेहनत लागते ह्याला" आणि हसण्यवारी नेतो. पण खरच असे असते का ? की आपल्या मनात काही वेगळे असते आणि आपणो दाखवतो भलतेच ?
त्यानंतर मात्र कोणी गप्प बसत नाही, जो तो आपआपले सल्ले देण्यास सुरू होतो. अचानक सर्वच जण डॉक्टरच बनून जन्माला आलेत  की काय असे वाटू लागते. अरे तू हे कर म्हणजे तुझे हे नीट होईल..., तू रोज फलाहर घे, कडधान्ये खा..., जास्वंदाच तेल डोक्यात घालून झोपत जा, अरे माझे ऐक..  माझ्या सासुच्या भाच्याने एक कोर्स केला... चक्क चार आठवड्यात ८ किलो वजन कमी झाले..., रोज  २५ तरी बैठका आणि १० जोर मार..., मिस्टर पर्फेक्ट जिम लाव मस्त कोच आहे तिथे, टेन्शन घ्यायचा कमी कर तू..,  नको... नक्को.. स्वींमिंगला जा.. सर्वात बेष्ट.

इतक्या सर्वानी आपली केस घेतल्यावर आपले पुढील सोपस्कार चालू होतात. सायकल विकत घेणे (फक्त विकतच घेणे हां), स्वींमिंगला जायला सुरूवात करणे, जीव अगदी मुठीत घेऊन तेलकट पण चविष्ट पदार्थ, गोड धोड, ओल्या पारट्या काही काळ का होईना पण वर्ज्य करणे, जिम ला जाणे.... जिम चा तर वेगळाच किस्सा आहे... आजकाल म्हणे जिम रात्री २-३ वाजेपर्यंत चालू असतात !!!  का  तर म्हणे दिवसभर वेळ मिळत नाही लोकांना म्हणून. मला तर ही गोष्टच घशाखाली उतरत नाही... अहो रात्री २ वाजता ट्रेडमिल वर धाउन वजन वाढणार, कमी होणार, की अजुन भल्तच काही...

ठीक आहे ठीक आहे.... मला माहितीये, आता काहींच्या मनात येत असेल सर्वच लोक अस करत नाहीत, आम्ही वजन कमी करण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी जिम ला जातो, ट्रेक्कींग करतो, स्विम्मिंग ट्रेनिंग घेतो.... तुम्ही अगदी बरोबर आहात. मी हे अजिबात नाकारत नाही की बरेच लोक पुढे जाउन आपल्या  आरोग्यास अपाय होऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टी करतात.... पण...वजनावळ देऊनच ना.

मला फक्त एवढेच वाटते... पुर्वीसारखा काळच आता नाही, शुद्ध हवा, निर्मळ पाणी नाही, अशी कामेच आता उरली नाहीत की जी करून आपोआपच व्यायाम होत असे आणि शांत झोप लागे.

टॅक्स देण्यासारखा  "वजनावळ" देण्याचा नियमहि निघेल बहुतेक काही कालांतराने.

काळजी घ्या. 
देसाई अभिजीत.



Tuesday, March 1, 2011

गोरा राजा

गेले ३-४ आठवडे माझ्या स्टुडिओ मधे अमेरिकेहून क्लाइंट्स आले होते. दोघेच होते. आम्ही सध्या काम करत असलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक आणि दुसरी निर्माती. नाव गाव सांगू शकत नाही ( सिनेमाचे ही आणि त्या दोघांचेही )  एन. डी. ए. साइन केले आहे ना काय करणार. :)  उगाचच माझी पंचाईत नको व्हायला.

आमच्या स्टुडिओ मधे तसे बरेच आणि बर्‍याच ठिकाणहून क्लाइंट्स येतात. आणि ते येणार म्हणून स्टुडिओ जरा नेहमी पेक्षा वेगळाच दिसतो. तसा आमचा स्टुडिओ ( म्हणजे आमची काम करण्याची जागा ) हा इतर सर्व वर्कप्लेसेस पेक्षा अगदी फुल्लोन आहे हां. अगदी कोणालाही हेवा वाटावा अशी. ;) सर्व ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची खेळणी, भिंतींवर मूवीस चे पोस्टर, पेंटिंग्स, आकर्षक डेस्क्स आणि इनडाइरेक्ट लाइटिंग म्हणतात तशी मस्त लाइट सेटप.

माफ करा बरेच बोललो.... तर मुदयावर येतो की... क्लाइंट्स येणार म्हणून बरेच काही बदल घडतात स्टुडिओ मधे.. कॅंटीन मधील प्रत्येक टेबलवर विदेशी फुलांचे फ्लवरपॉट्स येतात, ए सी जरा जास्तच चिल्ड होतात, दारात मस्त रांगोळी काढली जाते, संपूर्ण फेसिलिटीस डिपार्टमेंट धावपळ करत असत.
मी म्हणेन एका दृष्टीने बघितला तर हे सर्व ठीक आहे, म्हणजे मला यात तस वाईट असे काही वाटत नाही. पण... "उद्या आपल्याकडे क्लाइंट्स येणार आहे म्हणून सर्वानी स्टुडिओत नीट वागावे, सर्वानी चांगला पोशाख घालावा, सकाळचा नाश्ता ९ वाजेपर्यंतच मिळेल, सर्व आर्टिस्ट ९.१५ पर्यंत डेस्क वर काम करण्यास आले पाहिजेत," अश्या सूचनांचा मेल क्लाइंट्स येण्या आधी तुमच्या ऑफीस मधे सुद्धा येत असेल तर मी समजेन.. आमच्यासोबत आणखी कोणीतरी आहे. चला... हे सुद्धा कसेतरि मान्य केले ( फ्रँकली स्पीकिंग मला मान्य नाही ) कारण क्लाइंट हा शेवटी आपल्याकडे काम आणे त्या ओघाने पैसा घेऊन आलेला असतो. पण... पण  हे प्रकर्षाने होत जेंव्हा "गोरे" पाहुणे येतात. गेल्या ३-४ वर्षात मी कधीच पाहिले नाही की उद्या कोणी भारतीय चित्रपट श्रष्टीमधला दिगर्शक, निर्माता येत आहे आणि यातली एकतरी गोष्ट घडली आहे... छे.. मला आठवतही नाही.

अहो ईतकेच काय... भारताबाहेरून येणार्‍या क्लाइंटमुळे कॅंटीन मधे चक्क अंड्याच्या गोष्टी बनत नाहीत, का तर त्याचा वास पसरेल सगळीकडे.  आता मला सांगा जगातला कोणता माणूस अन्ड खात नाही. गोरयांचा तर ब्रेड ओम्लेट हा आवडता नाश्ता असावा.  त्यानी असा वास आल्यावर प्रॉजेक्ट काढून घेतला असता की काय !!!

आता जर तुम्ही म्हणाल की तो शेवटी क्लाइंट आहे त्याची काळजी घेतली पाहिजे... पण मग मला सांगा आपल्या देशातून, देशातून काय आमच्या मुंबईतुन एखादा क्लाइंट येत असेल तर त्याची काळजी का घेऊ नये आपण, तो सुद्धा प्रॉजेक्ट आणतो, काम झाल्यावर त्याचा मोबदलाही देतो.. यावर ए सी जास्त चिल्ड करण सोडाच, पण "हा" क्लाइंट आलेला काळातही नाही.

देशाबाहेरून आलेल्या वाकतीचे आदरतिथ्य करण्यापर्यंत ठीक आहे... पण एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणहून आलेल्या वक्तींच्या "आदरतिथ्यात" एवढी तफावत असणे खरच बरोबर आहे  का....  का आपण अजूनही अप्रत्यक्ष्यरित्या त्यांना...गोरयांना आपला राजा मानतो.


मी भारतातील पहिल्या ३ पोस्ट प्रोडक्षन स्टुडिओ पैकी एक अश्या स्टुडिओत काम करतो आणि वरील संदर्भात मला माझ्या स्टुडिओबद्दल नाही तर इथे रूढ झालेल्या ( या रूढींचे मूळ मला माहीत नाही ) गोष्टींबद्दल वाईट वाटते. मला हे ही माहीत नाही की तुमच्यापैकी किती जणांसाठी हे नवीन आहे की तुम्हिसुद्धा हे कुठेतरी केंव्हा तरी अनुभवले आहे.


गेले ३-४ आठवडे आमच्याबरोबर असलेले क्लाइंट्स, गेल्या शुक्रवारीच पून्हा आपल्या देशी परत गेले. आणि ते असताना "जरा जास्त" चिल्ड केलेला ए सी आज पुन्हा कमी झाला आणि ह्या सर्व गोष्टी मनात गरम  झाल्या.


देसाई  अभिजित

Monday, February 28, 2011

अपमान गदेचा, कि.......

त्या दिवशी स्टुडिओ ला जाताना बाइक नेली नाही, सर्विसिंग ला दिल्यामुळे नेता आली  नाही.( स्टुडिओ म्हणजे माझे ऑफीस... मी मुंबईत एका अनिमेशन स्टुडिओ मधे काम करतो. आणि मी ऑफीसला चाललो आहे असे कधीच बोलत नाही, तसे बोलायला मला आवडतच नाही म्हटले तरी चालेल..ऑफीस म्हटल कि माझ्या अंगावर शर्ट पॅंट चढते आणि गळ्याभोवती टाय  आवळतो )

असो, तर बाइक नेता न आल्यामुळे बस रिक्षा ने प्रवास करावा लागला. आणि हे रिक्षावले तर तुम्हाला माहीतच आहेत.. तुम्ही सांगितलेल्या जागी कधी येतील तर शपथ. संध्याकाळी घरी येताना तर मारामारच झाली. बस मधे ही तुडुंब गर्दी आणि रिक्षा ने जाव  तर त्यांची ती नाटके. शेवटी चिडून एका रिक्षात सरळ घुसलोच.... वैतागला तो रिक्षावाला फार, काय करणार मी तरी, नाईलाज... त्याची आपली बराच वेळ बड-बड चालूच राहिली.
रिक्षा वाल्याची बड-बड, रस्त्यावर फुल्लोन (fullon) रहदारि, आवाज.. मनात विचार आला, संध्याकाळी बाइक मिळाली नाही तर....

मालाड जवळ एका सिग्नलपाशी  आमच्या बाजूला एक बाई ( तिशीतली असावी ) बाइक घेऊन आली. तिच्या मागच्या सीट वर उलट्या दिशेने तोंड करून बसलेल्या तिच्या लहान मुलाने माझे लक्ष वेधले. रिक्षावाला त्या दोघानकडे बघून हसला आणि म्हणाला " का जमाना आ गवा हय् !!! "  त्या लहान मुलाची उलटी बसण्याची पद्धत बहुतेक त्याला  नवी असावी....

(आम्हा दोघांमधे घडलेले पुढील संभाषण हिंदीमधे होते)  


तो :- आजकाल पुरुषांची शानच उरली नाही कुठे.. आधी पुरुषांचा काय रुबाब होता, काय शान होती.
मी :- म्हणजे ?? कशाबद्दल बोलतो आहेस तू !!!
तो :- मी सतरा अठरा वर्षांचा असताना आमच्या गावात कुस्तीच्या आखाड्यात जात असे. ( यु पी, बिहार मधील कोणत्या तरी गावाचे नाव त्याने घेतले, आठवत नाही आता). हे भले भले पहिलवान येत असे तालमिला. आम्ही पण आपले जात असो...आणि खास आकर्षण दरवर्षी होणार्‍या स्पर्धेचे  असे. "गदा" जिंकण्याची स्पर्धा.
मी :- कोणती गदा आणि काय स्पर्धा होत असे ?
तो :- इथे मुंबईत कश्या  शरीरसौष्ठव स्पर्धा होतात त्याप्रमानाणे आमच्या भागात गदा जिंकत असत. आजूबाजूची १०-१२ गावे यात भाग घेत. ३-४ वर्षे ती गदा आमच्या गावाकडून कोणी घेऊच शकला नाही.
(त्याची छाती गर्वाने फुलत होती. )
मी :- असं काय होतं त्या गदेमध्ये ?
तो :- अहो साहेब,  ती गदा मिळवणे म्हणजे खूप मोठा मान होता गावासाठी. इतकं सोपं नव्हतं ती गदा उचलणं. भल्या भल्यांना पाणी पाजत असे ती गदा.
( ती गदा म्हणजे एक प्रकारचा वजनदार दगड होता  )
मी :- बरं, मग ह्याचा आणि पुरुषांच्या मानाचा काय संबंध !! 
तो :- एकदा आमच्या गावातील ३-४ बायकांमध्ये पैज लागली. त्यांच्या पैकी एक बाई ती गदा उचलू शकते असे तिचे म्हणणे होते. मूर्खं बायका..
तश्या आमच्या गावातील सर्व बायका अगदी समजूतदार .. चूल आणि मूल सांभाळून शेतीची कामे त्या करत असत... त्यांचं आणखी काम ते काय...
(त्याच्या ह्या बोलण्यावर मला काही बोलावेसे वाटले नाही कारण आजही भारतातील कित्येक गावात स्त्रियांना दिल्या जाणार्या वागणुकीबाबत खंत केली जाते , आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हि तर जवळपास  १५ वर्षांपूर्वीची गोष्ट  असावी )

त्याचे बोलणे चालूच होते..

तो :- रात्री त्या सगळ्या आखाड्यामागे जमल्या, संधी साधून आत शिरल्या आणि ठरल्या प्रमाणे एकीने ३-४ प्रयत्न करून शेवटी ती गदा उचललीच...
मी :- वा... फुल्लोन ( माझ्या तोंडून अगदी उत्स्फूर्त पणे हे शब्द निघाले )
तो :- अहो काय वा "साहब जी " दुसर्या दिवशी जेंव्हा गावात हि गोष्ट झाली तेंव्हा त्या चौघींनाही पंचायतीत बोलावले  आणि त्यांना जबर शिक्षा करण्यात आली..
( माझ्यासाठी हे जरा अतीच होतं
मी :- काय !!! कशासाठी ? फक्त ती गदा उचली म्हणून ?
तो :- अहो... त्या दिवसानंतर ती गदा कुणाला जिंकताहि आली नाही... कारण त्याच दिवशी सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन ती गदा विहिरीत टाकून दिली..जी गदा आखाड्यात तालमी करणाऱ्या पुरुषांसाठी आव्हान होती ती एका बाईने उचलल्यावर पुरुषजातीचा काय मान राहणार आणि एका बाईने उचललेली गदा उचलण्यात कसला आलाय "पुरुषार्थ".

माझ्या आता लक्षात आले कि तो मगाशी त्या बाईक  वर बसलेल्या  लहान  मुलाकडे बघून हसला नव्हता. 
पण ह्या विषयावर त्याच्याशी पुढे काही बोलण्यापेक्षा मला  सिगारेट  पेटवणे जास्त चांगले वाटले...... 




देसाई  अभिजीत.

Sunday, February 20, 2011

पहिले पान....

                    काल रात्री १ च्या सुमारास  ब्लॉग कार्यरत (active) केला. खरे सांगायचे तर १-२ वर्षांपूर्वीच blog-spot वर लॉगीन केले होते. पण ते असच... प्रत्येक वेळी वाटायचे आपणही काही तरी लिहूया, काहीतरी लिहूया पण छे... कधी जमलेच नाही. कारण त्या वेळी मी विचार करत असे लिखाण करणे म्हणजे  एकदम प्रोफेशनल असलेच पाहिजे, मग विचार सुरु झाले असे लिहितो तसे लिहितो , ह्या विषयावर लिहू कि त्या ... मला जमेल ना, कि पचका होईल वगैरे वगैरे. विचार करून करून काहीच सुचेना, दिवस लोटले, महिने गेले... आणि मग कधी हा ब्लॉग लिहिण्याचा किडा माझ्या मनातून पुसला गेला ते कळलेच नाही.

                 काही महिन्यांपूर्वी इंटरनेट वर सर्फ करताना एक ब्लॉग डोळ्यासमोर  आला, तो मी वाचला देखील... नंतर वेळ मिळाला तेंव्हा त्या ब्लॉगरचेच २-३ ब्लॉग्स वाचले,  आणि कधी काळी डोक्यातून गायब झालेला  तो "लिहिण्याचा" किडा कधी पुन्हा डोक्यात घर करून गेला काळेच नाही. अक्चुअली  गोष्ट  जरा वेगळी होती. ह्या वेळी मी विचार केला ... एकतर मी लिखाणात प्रोफेशनल नाही, माझा तो गुणधर्मच नाही, किंवा मला यात काही करियर सुद्धा करायचे नाही .... पण मला लिहायचे आहे. मग अगदी day today life मध्ये जे माझ्या समोर घडते, जे माझ्या मनात विचार येतात, जे मी घरी, मित्रांबरोबर share करतो.. (कधी करतही नाही ) त्याच गोष्टी का इथे लिहू नये.... मग ते कसही का असेना माझी एक लिहिण्याची इच्छा तरी पूर्ण होईल. आणि मग ठरवले.. चला सुरुवात तर करूया.... मनातले शब्दात मांडून  ह्या ई-कागदावर आणूया... म्हणूनच हा ब्लॉग  "मन टि. व्ही."

आज रविवार, दिवसभर नुसता आणि नुसता टाइम पास  केला. संध्याकाळी बायकोने कॉफी करून दिली, पिताच होतो, म्हटलं... चला हा मन टि. व्ही. चालू तर करूया... बघू किती दिवस चालू राहतो ते. :)


कॉफी थंड झाली बहुतेक .... गरम करून आणतो.